Monday, June 26, 2017

Demonitization

"काळ्या पैशाच्या नावाने", "भाबडा आशावाद तारेल? " हे दीक्षानंद भोसले यांचे लेख केवळ,  'विरोध सक्षम हवा' म्हणून केलेला प्रयत्न वाटला. जनता सुज्ञ आहे. "संधी मिळाली असती तर आपणही काळी माया जमा केली असती का? " असा प्रश्न त्यांना पडतो. पण ज्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असते त्यांना अशा संधी संधी वाटत नाहीत. काळी माया जमवावी असं त्यांना वाटतही नाही. नकळत आपले काही चुकले असे वाटले तरी टोचणी लागते. काळा पैसा जमा करणाऱ्यांविषयी "राग असणे" याला भोसले "आसुया असणे" म्हणतात याचे आश्चर्य वाटते. रांगबळींविषयी सर्वांनाच सहानुभूती आहे. पण त्याला मोदी जबाबदार की 'नवीन चलन' बॅंकेच्या मागच्या दाराने परस्पर नेणारे धनदांडगे? तशाही एवढी लोकसंख्या असलेल्या देशाला रांगा नवीन नाहीत. पंढरपुर, शिर्डी, तिरुपति काय किंवा सिद्धिविनायक दर्शनासाठीच्या रांगा, बिले भरायच्या रांगा, तिकिटांच्या रांगा, प्रवेशाच्या रांगा; सर्व सामान्यांना रांगा लावाव्या लागतातच. मग आत्ताच का त्यांचं असं भांडवल?
सर्वसामान्य हे सुद्धा विचार करतात, ती काही फक्त विद्वानांची (Intellectuals) मक्तेदारी नाही.
राहिली गोष्ट देशप्रेमाची. तर स्वत: चे ते देशप्रेम आणि इतरांचे ते 'उफाळून आले' वगैरे शब्द का? देशप्रेम ही एक भावना आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून ती व्यक्त होऊ शकते. आपल्या देशातील नागरिकांना त्रास होणार नाही असे वागणे म्हणजे देशभक्तीच आहे की. आपल्याला दिलेले काम योग्य रितीने पूर्ण करणे, वाहतुकीचे नियम पाळणे, बेकायदेशीर कामे न करणे... असे चांगले वागणारे कित्येक सज्जन असतात,  त्यांचा हे असे 'देशप्रेमाचा ज्वर' असे शब्द वापरून आपण अपमानच केला आहे.
लोकसत्तासुद्धा अचानक मोदीविरोधी सूर लावत आहे. "का? "तर पुढे जाऊन ते हुकुमशहा होतील या भीतीने? अर्थात सगळा देश स्वच्छ करायचा आहे तर असा धुराळा उडणारच. मोदींनी फक्त पहिला झाडु मारला आहे. त्यासाठी कोणी त्यांना देव म्हणत नाहीये. पुढचं काम आपणच सगळ्यांनी करायचं आहे. आधीचा कचरा रिझवून टाकायचा आणि नवीन कचरा कोणाला टाकू नाही द्यायचा;  हे आता आपणच मनावर घेऊन करायचं आहे.
#लोकसत्ता

No comments:

Post a Comment