Saturday, May 30, 2020

कधी वाटते मुक्त भन्नाट व्हावे
कधी उंबऱ्याने मला थोपवावे...

कधी उंच इतुके की आकाश भ्यावे
कधी जानकीसम भूतळी लुप्त व्हावे...

कधी तारकांना चमकुनी लाजवावे
कधी गुप्त कित्येक अंधार प्यावे...

कधी वीज होऊन वेगास ल्यावे
कधी वाटते गोठूनी स्तब्ध व्हावे...

कधी क्रोध उधळून वन पेटवावे
कधी शांततेने तरल व्यक्त व्हावे...

कधी रिक्त व्हावे, कधी मी फुलावे
कधी मी दिसावे, नि अदृश्य व्हावे...

कधी हास्यरंगात रंगून जावे
कधी आसवांच्या डोही बुडावे... 

कधी भरभरोनी मी प्रपंचास प्यावे
कधी पंचत्वे विरघळोनी निजावे...

सुकृता पेठे

Tuesday, April 16, 2019

आणि त्याचं असं म्हणणं आहे....

कॉलेजमध्ये आल्यापासून अभ्यासाला जुंपलो होतो...
पण प्रॅक्टीकलला तू आलीस तेव्हाच मी संपलो होतो...

Physics च्या circuits बरोबर तुझ्याशी नातं जोडत होतो...
तुझ्या माझ्या chemistry च्या reactions ताडत होतो...

Journal complete करताना फक्त तुलाच आठवत होतो...
व्यक्त न होता सगळी पानं कोरीच सोडत होतो...

Journal correction च्या वेळी जेव्हा तू समोर दिसलीस...
चेहेरा गंभीर ठेवलास तरी डोळ्यांतून माझ्याशी हसलीस...

ओठ घट्ट मिटलेस तरी डोळ्यांनी  बोलून गेलीस...
अन् त्याक्षणापासून जणू तू चक्क माझीच झालीस...

तुझ्यामुळे राहीलेली journal तुझ्यापुढे टाकली...
अन् खात्री करण्यासाठी मग एक दिवस गॅप घेतली...

दुसऱ्या दिवशी मला शोधणारी कावरीबावरी तुझी नजर...
आणि उत्तर मिळालं म्हणून.. मी तुझ्यासमोर हजर...

माझ्या कोऱ्या पानांवर तूच भरून राहीली होतीस...
माझ्यावर ताबा मिळवून हृदयात माझ्या शिरली होतीस...

https://m.facebook.com/story.php?story_fbid=2109822502621476&id=100007812402682

Saturday, February 2, 2019

Save girl child

#savegirlchild

आई... थांब, उठू नकोस. मी तुझ्या स्वप्नात हाका मारते आहे तुला... ओळखलस? नाही ना? अगं मी तुझी मुलगी... दुसरी मुलगी. बरोबर आहे... तू कशी ओळखणार मला? पण, मी नाही विसरणार तुला. कारण तुझ्याशिवाय कोणालाच मी बघितलं नाहीये. तसं तुला तरी कुठे बघितलं आहे. पण तुझी स्पंदनं मला जाणवायची... मी हरखून जायचे... त्या स्पंदनाबरोबर मी झुलायचे... त्या ठेक्याचा मला नादच लागला जणु... इतका की एक दिवस माझ्यातही ती स्पंदने धडधडू लागली. तुझी स्पंदनं आता माझी झाली होती.
अजून एक जीवघेणं आकर्षण होतं. ते म्हणजे तुझ्या श्वासाचं. तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर मला चैतन्य मिळायचं... हवहवसं वाटणारं, मोहक आणि आश्वासक. कधी एकदा बाहेर येऊन मीही असाच श्वास घेईन असं वाटायचं.

मी रोज वाढत होते. माझ्या एकेक जाणिवा तयार होत होत्या. आणि या सगळ्याबरोबर मी तुझ्यात गुंतत होते. मला तुझीच ओढ वाटत होती. अवघा ६०, ६५ दिवसांचा सहवास पण तुझ्या उबेत मी तुझ्याशी एकरूप झाले होते. एक दिवस अचानक माझ्या भोवती लाटा आल्या.... मी थरथरले. पण त्या दिवसानंतर तू बदललीस. तुझ्या मनात कसले वादळ होते मला कळलं नाही. पण तू दुःखी झाली होतीस हे मला कळत होतं. मला नाळेतून मिळणारे अन्नरस एकदम निरस झाले होते. तुझ्या स्पंदनांची लय मध्येच चुकत होती. मी दचकायचे...किंचित घाबरायचे. पाण्यात असूनही ओलावा कमी झाल्यासारखा वाटत होता. ते चार-पाच दिवस मी तुझ्यासारखीच, तुझ्याइतकीच अस्वस्थ होते. दोनशे दिवस मोजायला मी तयार होते पण असं वाटलं की तूच तयार नव्हतीस...

आणि दोनच दिवसात तुझी धडधड खूपच वाढली... नाळ कडक झाल्यासारखी वाटली... अचानक माझ्या भोवतीचा उबदार कोष फुटल्यासारखा वाटला... कोणी तरी मला तुझ्यापासून ओरबाडून घेत होतं... नुकत्याच फुटलेल्या हातांनी तुला पकडण्याचा मी खूप प्रयत्न केला गं... ... .... पण माझी नाळ तुटली आणि सगळी शक्ती संपली... कोणी दुष्टाने मला तुझ्यापासून असं दूर केलं? आई, तुला पण मी आवडायचे ना गं? मग तू काहीच कसं केलं नाहीस?

एक विचारायचं होतं म्हणून तुझ्या स्वप्नात आले. आई, पुन्हा एकदा मी तुझ्या गर्भात मुलगी बनूनच आले तर मला वाचवशील ना?

सुक‌ता पेठे

#savegirlchild

Friday, December 28, 2018

Me too!

कळी असताना वासनेच्या चिखलाने लडबडलेल्या हातांचे नकोसे स्पर्श सहन केलेस... कधीकधी तिथेच उमलायची थांबलीसही तू... पण बऱ्याचवेळा तो चिखल झटकून उमललीस... अर्थात ते उमलणंही सहजपणे नाही झालं... वखवखलेल्या नजरांचे रोख चुकवत, कधी गर्दीत तर कधी एकाकी ठिकाणी होणारे 'नकोसे', थरकाप उडवणारे स्पर्श सहन करत... कधी जाणूनबुजून द्वयअर्थी केलेल्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत... कधी एकतर्फी प्रेमाच्या हल्ल्यांनी जळत... कधी सामुदायिकपणे ओरबाडली जात, पाकळ्याच उखडून टाकलेलं उध्वस्त फुल बनत... जगत राहिलीस तू... कायमच मूकपणे... किंवा केवळ अस्फुटशा किंकाळ्या देत... स्वत:च स्वत:च्या वेदनेवर फुंकर मारत... 'समाज मला काय म्हणेल?' याचा विचार करत... 'त्या'च्या सामाजिक स्थानाचं वर्चस्व मान्य करत... 'त्या'ची मनमानी चालवून घेत राहिलीस तू... भावनांनी अंध बनून 'त्या'च्या   नकोशा वाटणाऱ्या मागण्या पूर्ण करत राहिलीस... 'नाही न म्हणण्याची' जणू भीडच घालून घेतलीस स्वत:ला... आणि म्हणून "दबून राहणे हेच योग्य" अशी समजूत करून... जगत राहिलीस तू...
पण कोण कुठल्या अमेरिकेत तराना नावाच्या सामाजिक कार्यकर्तीने एका १३ वर्षाच्या मुलीने सांगितलेली तिच्यावर झालेल्या अत्याचाराची व्यथा ऐकली आणि तिच्या मनातला उद्गार एक चळवळ बनून गेला... तो उद्गार म्हणजे "me too!"
सह-अनुभूतीतून सामर्थ्य देणाऱ्या ह्या me too च्या लाटेला समाज माध्यमांनी पुरेपूर वाव दिला आणि "me too" ही सगळ्यांची चळवळ झाली...
तू पेटून उठलीस... मनात खोल कुठेतरी दडपून आणि लपवून ठेवलेल्या जखमा, व्रण, घाव सगळ्यांना उघडपणे दाखवलेस... कोणी ह्या 'जखमा' खोट्या ठरवल्या, तर कोणी 'तुलाच' दोषी ठरवलं... पण आता तुला कोणालाच भ्यायची गरज नाही... एक नक्की की सगळेच पुरुष शोषण करणारे नसतात... पण जे पुरुष वेगवेगळ्या चेहऱ्यांचा आणि नात्यांचा आव आणून त्यामागे आपला विकृत चेहरा लपवत होते, आपण समाजात बलवान असल्याने 'मला कोणीच काही करू शकत नाही' असं समजत होते ते मात्र आता तसं करताना घाबरले पाहिजेत!
कोणतीच चळवळ कायम चालू राहत नाही... पण ती एक नवीन पायंडा घालून जाते... म्हणून आपण आपल्या पुढच्या पीढीला डोळसपणे, मोकळेपणाने सांगू... की 'आता कोणीच दुर्बलपणे शोषण करून घ्यायचं नाही... आणि असं कोणाचं शोषण करण्याची चूकही कोणी करू नये'... आता परत परत होऊन गेलेल्या गोष्टींवर, "मला तेव्हा आवाज करता आला नाही" असं म्हणून नाही चालणार... अन्यायाविरुद्ध लगेच त्याचक्षणी आवाज करायची आता सवयच करून घेऊ...
अर्थात ही महिलांनी पुरुषांच्या विरोधात चालवलेली चळवळ नाही... ही शोषिताने शोषणाविरुद्ध उभी केलेली चळवळ आहे... म्हणूनच ती स्त्री-पुरुष सर्वांची आहे...
आपल्याला सगळ्यांना पूर्वीपासूनच शोषणाविरुद्ध "नकार" द्यायचा हक्क आहे फक्त तो आता "मोठ्याने", "ताठ मानेने" द्यायचा आहे...  आणि आलेले आवाज ऐकून "सावध" व्हायचं आहे... बस...

सुकृता

Thursday, March 1, 2018

Ratatouille...

स्टार मुव्हीज् वर काल परत एकदा  Ratatouille पाहीला... आणि पुन्हा एकदा आवडला...असाच खूप आवडणारा मुव्ही म्हणजे Eutopian जगाची झलक दाखवणारा तो म्हणजे Zootopia!
Zootopia मधलं 'Anybody can be anything in Zootopia' हे तत्त्वज्ञान अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या मनात उतरतं आणि निर्मळ आनंदाचा अनुभव मिळतो.
तशाच प्रकारचा तरल आनंदाचा अनुभव Ratatouille पहाताना घेत होते. फ्रान्समधला  सर्वोत्तम Restaurant Critic, Mr. Anton Ego शेवटी 'Anybody can cook' चा अर्थ असा समजावतो की “Not everyone can be a great artist, but a great artist can come from anywhere". 
त्याचा 'ego'...'अहंकार'... जो एखाद्या गोष्टीची मक्तेदारी कायम स्वत:कडे ठेवणाऱ्या समाजाच्या अहंकाराचं 
प्रतिनिधित्व करतो ... 
आपल्याला उंदीर स्वयंपाक घरात दिसला तरी आवडत नाही...पण स्त्री-पुरुष, जात-पात, धर्म-वर्ण असे भेदभाव करणाऱ्यांनासुद्धा चक्क 'एक उंदीर' उत्तम शेफ आहे आणि लोकांना त्यांच्या हातचे पदार्थ आवडतात हे बघायला खूप आवडतं...इथेच तो मुव्ही युनिव्हर्सल होऊन जातो...
मशीदीतून येणारी बांग आसमंतात पसरत होती...बाहेर होळी जळायला सुरूवात झाली होती...त्याचा मस्त वास वाऱ्याबरोबर आत आला... म्हणून खिडकीतून होळीच्या ज्वाळेकडे पाहिलं...मुव्ही संपत आला होता...'Mr. Ego ला सत्याची जाणीव होत होती...आणि अहंकार त्या ज्वाळेमध्ये चूरचूर होऊन जातं होता....


Tuesday, September 26, 2017

माझ्या आठवणीतला पाऊस, दहावीच्या लेकीसाठी लिहिलेला

माझ्या आठवणीतला पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
कवयत्री शांत शेळके यांच्या कवितेचे शब्द जणू खरे झाले होते. खरंतर मला भीतीच वाटली. मीनाआत्या आग्रहाने मला तिच्या गावाला ऐन पावसाळ्यात घेऊन आली होती.
“तशीही गणपतीची सुट्टी आहे आणि ह्या काँक्रिटच्या जंगलातला पाऊस सहन करण्यापेक्षा आमच्या सांगलीला ये आणि तिथला पाऊस अनुभव”, आत्या मला म्हणाली.
आता पावसात काय वेगळं असणार? नुसता बदाबदा कोसळतो...सगळीकडे पाणी तुंबतं..गटारं ओसंडून वाहू लागतात...भिंतींना ओल येते...पण नाही, मी आत्याचा आग्रह मोडू शकले नाही.
नेमकी पोहोचले तेव्हा पाऊस पडत होता.पण इथल्यासारखा बदाबदा नाही तर झरझरा पडत होता. मागचा आठवडाभर पाऊस नसल्याने आजच्या पावसाने छान मातीचा सुगंधा येत होता. छोटे छोटे ओहोळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खळखळ वाहत होते आणि चक्क ते वाहणारं पाणी स्वच्छ होतं. आत्याचं घर शहरापासून जरा लांबच होतं. शांत रस्त्यावर तो ओहोळाचा आवाज जरा जास्तच मधुर वाटून गेला.
सगळी घरं कशी टुमदार, एक किंवा दोन मजली आणि घराच्या आजूबाजूला बागा... पावसाच्या पाण्याने सगळी आजूबाजूच्या झाडांची मनसोक्त भिजणारी हिरवीगार पानं बघितल्यावर मलाही तसाच भिजावंसं वाटलं.
तेवढ्यात पाऊस जरा थांबला. जुईच्या मांडवाखाली पहिल्यांदाच जुईची फुलं वेचली. हातातल्या ओंजळीतल्या जुईच्या नाजुकश्या फुलांचा तो मोहक वास मी कधीच नाही विसरणार...
पाऊस थांबलाच आहे तर गणपतीसाठी फुलं गोळा करू असं म्हणत आत्याने मला फुलांच्या प्रदर्शनातच नेलं. पण हे प्रदर्शन देखणं होतं...मुख्य म्हणजे कृत्रिम नव्हतं. तेरडा, कर्दळ, कुंद, चाफा, नागचाफा, अबोली, कोरांटी अशी नावं सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकत परडीत फुलं गोळा केली. बेल, तुळस आणि दुर्वा अशी पत्रीसुद्धा घेतली.
“हळू गं, निसरडं झालंय, घसरशील...”, आत्या म्हणेपर्यंत घसरलेच. घराभोवती सिमेंटचे, डांबराचे रस्ते किंवा पार्किंगस् असतात अशा ठिकाणी वाढलेली मी. ते ‘निसरडं’ पाहून पण मला मजा वाटली. हाताला लागलेली ती ओली माती पाहून जणू मेंदीच लावल्याचा आनंद झाला.
श्रावण नुकताच संपला होता. तरी उन पावसाचा खेळ चालूच होता. आत्याकाडचे दहा दिवस अगदी मंतरलेले होते. घरात भावंडांबरोबर गणपती उत्सवाची धमाल आणि बाहेर हा असा मनोहारी पाऊस अनुभवायचा. आत्ता मला कळत होता की ‘पाऊस अनुभवायचा’ म्हणजे नेमका काय ते.
पाऊस म्हणजे परसातील फुलं आणि लिंबोण्या वेचणे... पाऊस म्हणजे रस्त्यालगतच्या ओहोळात एखादा छोटासा दगड आला की तयार होणारी पाण्याची नक्षी बघणे आणि खेळता खेळता हातापायाला लागलेला चिख्खल त्या वाहणाऱ्या पाण्यात धुवून घेणे... पाऊस म्हणजे घरापुढच्या मांडवातून पडणाऱ्या पागोळ्या हातात धरणे... पाऊस  म्हणजे संध्याकाळच्या वेळी आकाशात होणारी रंगरंगोटी बघणे आणि इंद्रधनुष्य दिसलं की टाळ्या वाजवत उड्या मारणे... पाऊस म्हणजे सकाळच्या झुंजूमुंजू उजेडात पोपटी ओली पानं पाहत रहाणे आणि रात्रीच्या वेळी बेडकांचे डराव डराव ऐकणे.... पाऊस म्हणजे भिजलेले पंख कोरडे करण्यासाठी अंग थरथरवणारे रघु, मैना, चिमणी, बुलबुल पाहणे आणि पाऊस म्हणजे निसर्गाची उधळण बघून स्वतःही शहारणे! पावसाचा ‘अनुभव’ मनात भरून राहिला...
पावसाचा चिंबचिंब अनुभव घेऊन मी मुंबईला परत आले खरी; पण निसर्गापासून लांब राहून पावसावर निबंध लिहिताना अजूनही उपयोगी पडतो तो आत्याकडे अनुभवलेला पाऊस...पाऊस पानातला आणि माझ्या मनातला!


सुकृता पेठे

Monday, September 25, 2017

माझा आवडता पक्षी.... लेकीसाठी लिखाण

कोणाला मोर, कोणाला राघू, कोणाला बुलबुल तर कोणाला चिमणी असे छान छान पक्षी आवडतात पण मला विचाराल तर मी सांगेन की मला 'कावळा' आवडतो.
हा हा...हसू नका. असा 'काव-काव' कर्क्कश्श ओरडणारा, काळा, कुरूप पक्षी मला का आवडतो असा प्रश्र्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... तर ऐकाच...मला कावळा का आवडतो ते...
मित्रांनो, मला बोलणं समजायला लागल्यावर मी पहिली गोष्ट ऐकली ती ह्या काऊचीच की...
चिऊ आणि काऊच्या गोष्टीत पावसात चिंब भिजलेल्या कावळ्याला चिऊताई दार उघडत नाही तेव्हापासूनच ह्या कावळ्याविषयी मला फार आपुलकी वाटायची.
कावळा ह्या पक्ष्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या नसल्यामुळे कावळा दिसला तरी माणसे त्याला एरवीच हाकलतात.
पण पित्रुपंधरवड्यात मात्र पूर्वजांसाठी ठेवलेल्या वाडीला चोच मारायला ह्यांना कावळाच हवा असतो आणि खाण्यापिण्याविषयी फारसे चोचले न ठेवणारा कावळा वाडीतील खाऊ खातो आणि माणसांना समाधान देतो.
भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो. कदाचित म्हणूनच पूर्वीच्या काळी फोन आणि वाहने नसताना लग्न होऊन सासरी आलेली मुलगी कावळ्याला बघून आपल्या आईच्या आठवणीने व्याकूळ व्हायची आणि त्याची काव-काव म्हणजे जणू आपल्या माहरून कोणीतरी येणार असल्याची वर्दी देत आहे असे वाटून तिला 'ती काव-काव' सुद्धा हवीहवीशी वाटायची.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीसुद्धा विठुमाऊलीची वर्दी देणाऱ्या कावळ्याचे वर्णन
पैलतोगे काऊ कोकताहे...
शकून गे माये...सांगताहेत
असे केले आहे.
मित्रांनो, असा हा आपल्या सगळ्यांनाच जवळचा वाटणारा हा पक्षी प्रत्यक्षातसुद्धा फार मोठ्या मनाचा आहे.
कोकीळ पक्षाची मादी आपली अंडी नकळत कावळ्याच्या घरट्यात टाकून जाते. पिले बाहेर येईपर्यंत कोकीळेची अंडी कावळीणबाई उबवतात.
पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे की कावळा जेव्हा झाडावर उंच घर बांधतो तेव्हा पाऊस कमी पडतो आणि जेव्हा कमी उंच म्हणजे खाली बांधतो तेव्हा पाऊस जास्त पडतो.
आता मला सांगा, इतका चांगला, हुशार कावळा केवळ काळा म्हणून आवडत नाही असे म्हणणे चांगले का? आपल्या सगळ्यांना आपल्यातल्याच वाटणारा हा कावळा पक्षी मला खूप भावतो...खूप आवडतो.

सुकृता पेठे