Thursday, March 1, 2018

Ratatouille...

स्टार मुव्हीज् वर काल परत एकदा  Ratatouille पाहीला... आणि पुन्हा एकदा आवडला...असाच खूप आवडणारा मुव्ही म्हणजे Eutopian जगाची झलक दाखवणारा तो म्हणजे Zootopia!
Zootopia मधलं 'Anybody can be anything in Zootopia' हे तत्त्वज्ञान अगदी सहजपणे प्रेक्षकांच्या मनात उतरतं आणि निर्मळ आनंदाचा अनुभव मिळतो.
तशाच प्रकारचा तरल आनंदाचा अनुभव Ratatouille पहाताना घेत होते. फ्रान्समधला  सर्वोत्तम Restaurant Critic, Mr. Anton Ego शेवटी 'Anybody can cook' चा अर्थ असा समजावतो की “Not everyone can be a great artist, but a great artist can come from anywhere". 
त्याचा 'ego'...'अहंकार'... जो एखाद्या गोष्टीची मक्तेदारी कायम स्वत:कडे ठेवणाऱ्या समाजाच्या अहंकाराचं 
प्रतिनिधित्व करतो ... 
आपल्याला उंदीर स्वयंपाक घरात दिसला तरी आवडत नाही...पण स्त्री-पुरुष, जात-पात, धर्म-वर्ण असे भेदभाव करणाऱ्यांनासुद्धा चक्क 'एक उंदीर' उत्तम शेफ आहे आणि लोकांना त्यांच्या हातचे पदार्थ आवडतात हे बघायला खूप आवडतं...इथेच तो मुव्ही युनिव्हर्सल होऊन जातो...
मशीदीतून येणारी बांग आसमंतात पसरत होती...बाहेर होळी जळायला सुरूवात झाली होती...त्याचा मस्त वास वाऱ्याबरोबर आत आला... म्हणून खिडकीतून होळीच्या ज्वाळेकडे पाहिलं...मुव्ही संपत आला होता...'Mr. Ego ला सत्याची जाणीव होत होती...आणि अहंकार त्या ज्वाळेमध्ये चूरचूर होऊन जातं होता....


Tuesday, September 26, 2017

माझ्या आठवणीतला पाऊस, दहावीच्या लेकीसाठी लिहिलेला

माझ्या आठवणीतला पाऊस

पावसाच्या धारा येती झरझरा
झाकळले नभ, वाहे सोसाट्याचा वारा
कवयत्री शांत शेळके यांच्या कवितेचे शब्द जणू खरे झाले होते. खरंतर मला भीतीच वाटली. मीनाआत्या आग्रहाने मला तिच्या गावाला ऐन पावसाळ्यात घेऊन आली होती.
“तशीही गणपतीची सुट्टी आहे आणि ह्या काँक्रिटच्या जंगलातला पाऊस सहन करण्यापेक्षा आमच्या सांगलीला ये आणि तिथला पाऊस अनुभव”, आत्या मला म्हणाली.
आता पावसात काय वेगळं असणार? नुसता बदाबदा कोसळतो...सगळीकडे पाणी तुंबतं..गटारं ओसंडून वाहू लागतात...भिंतींना ओल येते...पण नाही, मी आत्याचा आग्रह मोडू शकले नाही.
नेमकी पोहोचले तेव्हा पाऊस पडत होता.पण इथल्यासारखा बदाबदा नाही तर झरझरा पडत होता. मागचा आठवडाभर पाऊस नसल्याने आजच्या पावसाने छान मातीचा सुगंधा येत होता. छोटे छोटे ओहोळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खळखळ वाहत होते आणि चक्क ते वाहणारं पाणी स्वच्छ होतं. आत्याचं घर शहरापासून जरा लांबच होतं. शांत रस्त्यावर तो ओहोळाचा आवाज जरा जास्तच मधुर वाटून गेला.
सगळी घरं कशी टुमदार, एक किंवा दोन मजली आणि घराच्या आजूबाजूला बागा... पावसाच्या पाण्याने सगळी आजूबाजूच्या झाडांची मनसोक्त भिजणारी हिरवीगार पानं बघितल्यावर मलाही तसाच भिजावंसं वाटलं.
तेवढ्यात पाऊस जरा थांबला. जुईच्या मांडवाखाली पहिल्यांदाच जुईची फुलं वेचली. हातातल्या ओंजळीतल्या जुईच्या नाजुकश्या फुलांचा तो मोहक वास मी कधीच नाही विसरणार...
पाऊस थांबलाच आहे तर गणपतीसाठी फुलं गोळा करू असं म्हणत आत्याने मला फुलांच्या प्रदर्शनातच नेलं. पण हे प्रदर्शन देखणं होतं...मुख्य म्हणजे कृत्रिम नव्हतं. तेरडा, कर्दळ, कुंद, चाफा, नागचाफा, अबोली, कोरांटी अशी नावं सुद्धा मी पहिल्यांदाच ऐकत परडीत फुलं गोळा केली. बेल, तुळस आणि दुर्वा अशी पत्रीसुद्धा घेतली.
“हळू गं, निसरडं झालंय, घसरशील...”, आत्या म्हणेपर्यंत घसरलेच. घराभोवती सिमेंटचे, डांबराचे रस्ते किंवा पार्किंगस् असतात अशा ठिकाणी वाढलेली मी. ते ‘निसरडं’ पाहून पण मला मजा वाटली. हाताला लागलेली ती ओली माती पाहून जणू मेंदीच लावल्याचा आनंद झाला.
श्रावण नुकताच संपला होता. तरी उन पावसाचा खेळ चालूच होता. आत्याकाडचे दहा दिवस अगदी मंतरलेले होते. घरात भावंडांबरोबर गणपती उत्सवाची धमाल आणि बाहेर हा असा मनोहारी पाऊस अनुभवायचा. आत्ता मला कळत होता की ‘पाऊस अनुभवायचा’ म्हणजे नेमका काय ते.
पाऊस म्हणजे परसातील फुलं आणि लिंबोण्या वेचणे... पाऊस म्हणजे रस्त्यालगतच्या ओहोळात एखादा छोटासा दगड आला की तयार होणारी पाण्याची नक्षी बघणे आणि खेळता खेळता हातापायाला लागलेला चिख्खल त्या वाहणाऱ्या पाण्यात धुवून घेणे... पाऊस म्हणजे घरापुढच्या मांडवातून पडणाऱ्या पागोळ्या हातात धरणे... पाऊस  म्हणजे संध्याकाळच्या वेळी आकाशात होणारी रंगरंगोटी बघणे आणि इंद्रधनुष्य दिसलं की टाळ्या वाजवत उड्या मारणे... पाऊस म्हणजे सकाळच्या झुंजूमुंजू उजेडात पोपटी ओली पानं पाहत रहाणे आणि रात्रीच्या वेळी बेडकांचे डराव डराव ऐकणे.... पाऊस म्हणजे भिजलेले पंख कोरडे करण्यासाठी अंग थरथरवणारे रघु, मैना, चिमणी, बुलबुल पाहणे आणि पाऊस म्हणजे निसर्गाची उधळण बघून स्वतःही शहारणे! पावसाचा ‘अनुभव’ मनात भरून राहिला...
पावसाचा चिंबचिंब अनुभव घेऊन मी मुंबईला परत आले खरी; पण निसर्गापासून लांब राहून पावसावर निबंध लिहिताना अजूनही उपयोगी पडतो तो आत्याकडे अनुभवलेला पाऊस...पाऊस पानातला आणि माझ्या मनातला!


सुकृता पेठे

Monday, September 25, 2017

माझा आवडता पक्षी.... लेकीसाठी लिखाण

कोणाला मोर, कोणाला राघू, कोणाला बुलबुल तर कोणाला चिमणी असे छान छान पक्षी आवडतात पण मला विचाराल तर मी सांगेन की मला 'कावळा' आवडतो.
हा हा...हसू नका. असा 'काव-काव' कर्क्कश्श ओरडणारा, काळा, कुरूप पक्षी मला का आवडतो असा प्रश्र्न तुम्हाला नक्कीच पडला असेल... तर ऐकाच...मला कावळा का आवडतो ते...
मित्रांनो, मला बोलणं समजायला लागल्यावर मी पहिली गोष्ट ऐकली ती ह्या काऊचीच की...
चिऊ आणि काऊच्या गोष्टीत पावसात चिंब भिजलेल्या कावळ्याला चिऊताई दार उघडत नाही तेव्हापासूनच ह्या कावळ्याविषयी मला फार आपुलकी वाटायची.
कावळा ह्या पक्ष्याविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्या सगळ्या चांगल्या नसल्यामुळे कावळा दिसला तरी माणसे त्याला एरवीच हाकलतात.
पण पित्रुपंधरवड्यात मात्र पूर्वजांसाठी ठेवलेल्या वाडीला चोच मारायला ह्यांना कावळाच हवा असतो आणि खाण्यापिण्याविषयी फारसे चोचले न ठेवणारा कावळा वाडीतील खाऊ खातो आणि माणसांना समाधान देतो.
भारतात हा पक्षी सर्वत्र आढळतो. कदाचित म्हणूनच पूर्वीच्या काळी फोन आणि वाहने नसताना लग्न होऊन सासरी आलेली मुलगी कावळ्याला बघून आपल्या आईच्या आठवणीने व्याकूळ व्हायची आणि त्याची काव-काव म्हणजे जणू आपल्या माहरून कोणीतरी येणार असल्याची वर्दी देत आहे असे वाटून तिला 'ती काव-काव' सुद्धा हवीहवीशी वाटायची.
प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनीसुद्धा विठुमाऊलीची वर्दी देणाऱ्या कावळ्याचे वर्णन
पैलतोगे काऊ कोकताहे...
शकून गे माये...सांगताहेत
असे केले आहे.
मित्रांनो, असा हा आपल्या सगळ्यांनाच जवळचा वाटणारा हा पक्षी प्रत्यक्षातसुद्धा फार मोठ्या मनाचा आहे.
कोकीळ पक्षाची मादी आपली अंडी नकळत कावळ्याच्या घरट्यात टाकून जाते. पिले बाहेर येईपर्यंत कोकीळेची अंडी कावळीणबाई उबवतात.
पक्षी निरीक्षकांनी सांगितले आहे की कावळा जेव्हा झाडावर उंच घर बांधतो तेव्हा पाऊस कमी पडतो आणि जेव्हा कमी उंच म्हणजे खाली बांधतो तेव्हा पाऊस जास्त पडतो.
आता मला सांगा, इतका चांगला, हुशार कावळा केवळ काळा म्हणून आवडत नाही असे म्हणणे चांगले का? आपल्या सगळ्यांना आपल्यातल्याच वाटणारा हा कावळा पक्षी मला खूप भावतो...खूप आवडतो.

सुकृता पेठे


Saturday, August 5, 2017

मनातलं मुखपुस्तकाच्या पानावर...

मनातलं मुखपुस्तकाच्या पानावर...

नुकतेच विजयनगर चंद्रशेखर गणेशोत्सवाचे 51 वे वर्ष आनंदात पार पाडले. त्या निमित्ताने मंडळाविषयी कृतज्ञता व्यक्त करते आहे.
मंडळी, सतत 51 वर्ष असा उत्सव चालु ठेवणे हे सोपे नाही.
लहानपणी आम्ही अशा मोठ्या काॅलनीमध्ये रहात नाही म्हणून खूप चुटपुटायचो. पण 1999 ला लग्नानंतर इथे आले आणि गेली 16 वर्ष गणेशोत्सवाची मजा, बरेच वर्ष लांबून,  नेहमी 100% प्रेक्षक बनून तर कधी सक्रिय सहभागी होऊन अनुभवते आहे....पण त्याची लज्जत खरोखर अवीट आहे!
उत्सव एक शाळाच आहे जणु...
Event Management शिकायला कुठे बाहेर जायला नको. मंडळाचे सर्व कार्यकर्ते बाहेरच्या कार्यक्रमात नक्कीच उजवे ठरत असतील. मग ते रोजची आरती असो, काकड आरती असो, सजावट असो, हळदीकुंकु असो, विविध स्पर्धा असोत, स्थानिक कार्यक्रम असोत की श्रींची आगमनाची आणि विसर्जनाची मिरवणुक असो... सगळंच कसं उत्साहात चालु असतं. हे सगळं करताना प्रत्येकाच्या प्रेरणा वेगवेगळ्या. कोणी भाऊक गणेशभक्त असतात तर कोणी मित्रमैत्रिणींना भेटण्याच्या ओढीने खाली उतरतात, कोणी वैचारिक मतप्रदर्शनासाठी तर कोणी अंगच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी. आपापले उद्योग, व्यवसाय, अभ्यास, परीक्षा, आजारपण असं सगळं संभाळून सगळे उत्सवमय झालेले असतात.
घरी बायको 'किती वेळ कट्ट्यावर काढता' म्हणून वैतागलेली असते, आई, 'अभ्यास' करत नाही म्हणून रागवत असते, बायका फार वेळ बाहेर असल्याने घरची घडी थोडी विस्कटलेली असते...अशा सगळ्यातून उत्सव निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी प्रत्येक जण यथा शक्ती घेतो हे खरोखर कौतुकास्पद आहे.
काळानुरूप उत्सवाचे स्वरूप बदलत गेले असेल पण बदल ही आयुष्यातली अतिशय आवश्यक प्रक्रीया आहे. तसंच हे सगळं करताना काही चुका होतात, पण चुकण्यातूनच सगळे 'घडत' आहेत हे महत्वाचे! असे घडलेले हिरे आपण जाणतोच. बऱ्याच जणांना Stage fear असते, समाजात मिसळण्याची भीती असते अशांसाठी हा उत्सव प्रभावी औषध आहे.
उत्सवाचे स्वरूप असे असावे, तसे असावे असं बाहेरून सुचना देणे खूप सोपे आहे पण प्रत्येकाने एकदातरी ह्यात स्वतःला झोकून देऊन बघावे मग त्यातले कष्ट, त्यातले ताणतणाव आपण समजून घेऊ शकु आणि मग मिरवणुकीत शिस्तबध्द लेझिमपथक, ध्वजपथक, टिपरीपथक किंवा ढोलपथक याचा आस्वाद घेतला तरी  DJ अनावश्यक वाटणार नाही....
अनेक महीन्यांचे नियोजन, प्रत्यक्ष उत्सवाचे दमछाक करणारे अकरा दिवस आणि बाप्पांना साश्रु निरोप देताना  गाण्याच्या शब्दांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, स्वतःला विसरून, केवळ मस्तीभऱ्या तालावर पावलं थिरकवत, धम्माल 'गणपती डान्स' करण्याचा हक्क तर सर्वांना हवाच! खरंतर तसं नाचणं पण खूप अवघड असतं...
गेटपाशीच हे सगळं थांबतं आणि मग पुन्हा सगळे जबाबदारपणे श्रींना सोडून येतात....पुन्हा एकदा घरी परततात पुढच्या वर्षीच्या गणेशोत्सवाची वाट बघत... गणपती बाप्पा मोरया!!!!

Monday, June 26, 2017

'स्वच्छ भारत'च्या निमित्ताने....

#swachhabharat
'स्वच्छ भारत'च्या निमित्ताने....

विजयनगरचा "शुन्य कचरा प्रकल्प" हा इतर अनेक अशा प्रकारच्या प्रकल्पांपेक्षा वेगळा आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे  रहिवाश्यांनी ह्या प्रकल्पासाठी आवश्यक तो खर्च करण्याची तयारी दाखवल्याचा सुज्ञपणा! कार्यकारी मंडळाचा पुढाकार, स्वयंसेवकांचे योगदान व सकारात्मक प्रचार आणि  सुजाण नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हे आपले यशाचे गमक आहे.

आपल्यानंतर आपल्यापासून प्रेरणा घेऊन सुरू झालेले काही प्रकल्प चुकीच्या दिशेमुळे बंद पडायच्या मार्गावर आहेत. किंवा काही आपल्या आधी सुरु होऊनही फारशी प्रगती करू शकले नाहीत अथवा कधीच बंद पडले. 'दिशा चुकीची' अशा करता म्हटले आहे की मुळातच असे प्रकल्प फुकटात व्हावेत किंवा कमीत कमी खर्चात व्हावेत किंवा असा प्रकल्प करून किती फायदा होणार अशा फाजील प्रश्नांवर ते उभे राहिले.

वास्तविक आपण आपले घर व स्वत: ला स्वच्छ ठेवण्यासाठी किती काय काय करतो... जसे की झाडु-पोछा करायला कामावर पगार देऊन कामवाली बाई नेमतो, फिनेल सारखी केमिकल्स विकत घेऊन वापरतो, साबण, शॅम्पुची तर घरी रेलचेल असते, परफ्युमस्, अत्तरे, डिओ, रुम फ्रेशनर अशा सुगंधी वस्तु आपल्या जीवनावश्यक गोष्टींमध्ये जाऊन बसल्या आहेत. मग आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी एखादा उपक्रम राबवताना फुकट व्हावा, कोणीतरी दुसऱ्याने खर्चाची जबाबदारी घ्यवी, सुका कचरा विकून पैसे मिळावे किंवा ओल्या कचऱ्यापासून बनलेले खत विकून आपल्याला फायदा व्हावा अशा अपेक्षा का असाव्या?

आपण आपला सुका कचरा आकार संघटनेला फुकट देतो. त्यांच्या केंद्रावर कचरावेचक त्याचे वर्गीकरण करतात. व तो कचरा Recyclers ना विकून त्यातून त्यांना उत्पन्न मिळते. ही एका अर्थाने समाजसेवाच नाही का?

ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्यासाठी आपल्याकडे स्त्री मुक्ती संघटनेच्या ३ परिसर भगिनींची नेमणूक करण्यात आली आहे. मुळात वर्षानुवर्षे कचरा उपसणाऱ्या कचरावेचकांना संघटित करून त्यांना खतनिर्मितीचे धडे देऊन स्त्री मुक्ती संघटनेने त्यांच्यासाठी उपजिविकेचे साधनच तयार केले आहे. अशा परिसर भगिनींची आपण पगार देऊन नेमणूक केली आहे. आपल्याला ५०० कुटुंबीयांना ३ परिसर भगिनींची आवश्यकता आहे. इतरांना कमी जास्त लागू शकतात. तसेच त्यांच्यावर देखरेख ठेवणाऱ्या स्त्री मुक्ती संघटनेच्या पर्यवेक्षिका यांचे मानधन आणि आता AGM नंतर नेमलेल्या व्यवस्थापकाचे मानधन, तसेच खताच्या हौदांची डागडुजी, पावसाळी शेड असा सगळा खर्च धरूनसुद्धा प्रत्येक कुटुंबाला दर महिन्याला  १०० रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. (खरंतर महिन्यातून कुटुंबातील सर्वांना दोन वेळा वडापाव आणला तरी याहून जास्त खर्च होईल)
पण असे असूनसुद्धा स्वत: ला जास्त सुशिक्षित आणि जास्त श्रीमंत समजणाऱ्या इतर ठिकाणी, वर सांगितल्याप्रमाणे चुकीची दिशा दाखवली गेल्याने लोक खर्च करायला तयार नाहीत म्हणून प्रकल्प बंद पडत आहेत.

या तुलनेत विजयनगरने दाखवलेली खर्च करण्याची तयारी कौतुकास्पद आणि स्वागतार्हच आहे आणि आपण सुसंस्कृत असल्याचा एक छोटासा दाखलाच आहे!

आमची सोसायटी पण खत फुकट देत नाही कारण फुकट मिळणाऱ्या गोष्टींना किंमत राहत नाही. त्याबदल्यात नाममात्र रक्कम प्रकल्पासाठी देणगी म्हणून घेतली जाते. पण त्यातून केवळ नाममात्र रक्कम मिळते. खत सोसायटी मधील झाडांसाठी वापरले जाते हा एक फायदा आहेच.

अजूनही काही ठिकाणी असे प्रकल्प होत असतीलच. अशा प्रकल्पांची जास्तीत जास्त माहिती इतरांना होऊन तिथेही असे प्रकल्प सुरू होणे आवश्यक आहे. काही वर्षांनी विशेष तंत्रज्ञान आले की घनकचरा व्यवस्थापन याहून सोपे आणि सरकारी यंत्रणेने होईल अशी अाशा करायला काहीच हरकत नाही.
पण तुर्तास आपणच यासाठी सरकारी यंत्रणेला हातभार लावावा ही काळाची गरज आहे!

सुकृता

Demonitization

"काळ्या पैशाच्या नावाने", "भाबडा आशावाद तारेल? " हे दीक्षानंद भोसले यांचे लेख केवळ,  'विरोध सक्षम हवा' म्हणून केलेला प्रयत्न वाटला. जनता सुज्ञ आहे. "संधी मिळाली असती तर आपणही काळी माया जमा केली असती का? " असा प्रश्न त्यांना पडतो. पण ज्यांची सद्सद्विवेक बुद्धी जागृत असते त्यांना अशा संधी संधी वाटत नाहीत. काळी माया जमवावी असं त्यांना वाटतही नाही. नकळत आपले काही चुकले असे वाटले तरी टोचणी लागते. काळा पैसा जमा करणाऱ्यांविषयी "राग असणे" याला भोसले "आसुया असणे" म्हणतात याचे आश्चर्य वाटते. रांगबळींविषयी सर्वांनाच सहानुभूती आहे. पण त्याला मोदी जबाबदार की 'नवीन चलन' बॅंकेच्या मागच्या दाराने परस्पर नेणारे धनदांडगे? तशाही एवढी लोकसंख्या असलेल्या देशाला रांगा नवीन नाहीत. पंढरपुर, शिर्डी, तिरुपति काय किंवा सिद्धिविनायक दर्शनासाठीच्या रांगा, बिले भरायच्या रांगा, तिकिटांच्या रांगा, प्रवेशाच्या रांगा; सर्व सामान्यांना रांगा लावाव्या लागतातच. मग आत्ताच का त्यांचं असं भांडवल?
सर्वसामान्य हे सुद्धा विचार करतात, ती काही फक्त विद्वानांची (Intellectuals) मक्तेदारी नाही.
राहिली गोष्ट देशप्रेमाची. तर स्वत: चे ते देशप्रेम आणि इतरांचे ते 'उफाळून आले' वगैरे शब्द का? देशप्रेम ही एक भावना आहे. छोट्या छोट्या गोष्टीतून ती व्यक्त होऊ शकते. आपल्या देशातील नागरिकांना त्रास होणार नाही असे वागणे म्हणजे देशभक्तीच आहे की. आपल्याला दिलेले काम योग्य रितीने पूर्ण करणे, वाहतुकीचे नियम पाळणे, बेकायदेशीर कामे न करणे... असे चांगले वागणारे कित्येक सज्जन असतात,  त्यांचा हे असे 'देशप्रेमाचा ज्वर' असे शब्द वापरून आपण अपमानच केला आहे.
लोकसत्तासुद्धा अचानक मोदीविरोधी सूर लावत आहे. "का? "तर पुढे जाऊन ते हुकुमशहा होतील या भीतीने? अर्थात सगळा देश स्वच्छ करायचा आहे तर असा धुराळा उडणारच. मोदींनी फक्त पहिला झाडु मारला आहे. त्यासाठी कोणी त्यांना देव म्हणत नाहीये. पुढचं काम आपणच सगळ्यांनी करायचं आहे. आधीचा कचरा रिझवून टाकायचा आणि नवीन कचरा कोणाला टाकू नाही द्यायचा;  हे आता आपणच मनावर घेऊन करायचं आहे.
#लोकसत्ता

प्रिय भूषण

भूषण, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तू ४० वर्षांचा झालास! त्या निमित्ताने तुझं थोडं कौतुक करावं म्हणून लिहायला घेतलं आणि सगळं बालपणच डोळ्यासमोर उभं राहिलं. तू 'शेंडेफळ', त्यामुळे आमचा सगळ्यांचा लाडका! पण लाड करायची वेळच कमी यायची...😅
लहानपणी एकदम बारिक पण फार तुडतुडा होतास. सतत धडपडायचास त्यामुळे सगळा वेळ काळजी करण्यातच जायचा. इतकी की डेक्कनला आजीकडे रहायला जाताना मी तुझी bodyguard म्हणूनच यायचे. (आई तुला पाठवायची हे तिचं  daring च म्हटलं पाहिजे...😅)
एखादा दिवस क्वचितच असा गेला असेल की तुझ्या हातापायावर bandage नाही आहे. असो, 'पडे धडे तो वाढे' या उक्तीप्रमाणे तू 'वाढलास' खरा!!!!
चौथीपर्यंत तुझा अभ्यास आई, मी, प्राजक्ता पूर्ण करायचो...पण पाचवीत आलास आणि एकदम शांत झालास तो आजही 'शांत' म्हणूनच सगळ्यांना माहीत आहेस. (हा आता कधी कधी चिडतोस ते सोडून देऊ...😝)
'वाढलास' म्हणाले ते यासाठी की तुझी तू केलेली प्रगती ही कौतुकास्पद आहे. मग ती ME करण्यात असो, नोकरीत challenging tasks करण्यात असो, बाजा वाजविण्यात असो, पेटी (harmonium) वाजविण्यात असो, तबला वाजविण्यात असो किंवा शास्त्रीय संगीताविषयी माहिती गोळा करण्यात असो...अगदी खोलवर जाऊन माहिती मिळवतोस.
तू 'ज्ञानी' आहेस याबाबतीत कोणाचंच दुमत नसावं...(पत्नी अपवाद असते....😜) पण Physics असो, Mathematics असो, Grammer असो किंवा Philosophy असो...राजकारण असो की आर्थिक गुंतवणूक... तुझ्या स्वतःच्या काही clear ideas असतात....खूप वाचतोस, खूप छान समजून घेतोस, समजावून देतोस... प्रत्येक गोष्ट खोलात जाऊन करतोस!
आता ह्या खोलवर जाण्याच्या वृत्तीमुळे तुझं घरी तास न् तास office थाटून बसणं, दोन दोन महिने कागदाची विविध विमानं करून घरभर उडवणे, cubes शी खेळ, सम्मीत, सौमिकच्या खेळामधले challenging games खेळत रहाणे, कधीही मनात आलं की तबला practice करणं हे सगळं आई आणि अदितीच सहन करू जाणे....😍
पण आमच्या सगळ्यांसाठी तू 'खास' आहेस हे तितकंच खरं आहे.
प्राजक्ताच्या लग्नात दात्यांच्या बंद घरात 'एकटं' झोपणं, बाबा ICU मध्ये असताना हॉस्पिटलच्या बाहेरच्या बाकड्यावर कुत्र्यांच्या भयाण ओरडण्यात 'एकाकी' झोपणं यातून तुझा धीरोदात्तपणा नेहमीच आम्हाला जाणवतो. बाबा गेले त्यावेळी आपण रात्रभर हताशपणे बसून राहिलो... तेव्हा जाणवलं की तूही तितकाच हळवा आहेस...आईला जपतोस, अदिती, मुलं, आम्ही दोघी आणि आमचं कुटुंब, भाचवंड, आत्ये-मामे- मावस-चुलत भावंडं, आपली सगळीच माणसं यांच्यावर भरभरून प्रेम करतोस...म्हणूनच तू इथल्या मातीत परत आलास.
खरंतर तू आमचा लहान भाऊ पण कधी आमच्याहून मोठा झालास ते कळलंच नाही!
पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹